गुरुवार, 16 फ़रवरी 2017

योगसूत्र कैवल्यपाद सूत्र 1-34 full

योगसूत्र कैवल्यपाद
 Author -- Dr Balram Sadashiv Agnihotri
Typed by Ashwini -- To proof read
   
    जन्मौषधिमन्त्रतपः समाधिजाः सिद्धजाः सिद्धयः ।।१।।
    काही सिद्धी जन्मानिमित्त (म्हणजे जन्म घेतल्यामुळेच) असतात. कपिल मुनींना जन्मतःच सर्वज्ञत्व होते. पक्ष्यांना  जन्मतःच आकाशगमनाची सिद्धी असते. काही सिद्धी औषधनिर्मित्ति असतात. काही सिद्धी मन्त्राच्या योगाने प्राप्त होतात, काही तपाच्या योगाने तर काही समाधिपासून प्राप्त उत्पन्न होतात. या सर्वांचे वर्णन विभूतिपादात
आले आहे.
       
          जात्यन्तर परिणामः प्रकृत्यापूरात्।।२।।
  एक देह जाऊन अन्य देह येणे हा जो परिणाम अथवा 'एक मनुष्यजाती' जाऊन अन्य 'देवजाती' प्राप्त होणे हा जो परिणाम यास जात्यन्तर परिणाम म्हणतात. पूर्वीच्या ज्या प्रकृती त्यांच्या्मध्ये असलेले जे विकार तेच विकार अन्य कमी विशिष्ट जातिरूपाने  परिणाम पावतात. पाश्चात्या एव हि प्रकृतयो=मुष्मिञ्ञन्मानि विकारानापूरयन्ति जात्यन्तराकारेण परिणामयन्ति।'

             निमित्तप्रयोजकं प्रकृतीनां वरणभेदस्तु ततः क्षेत्रिकवत् ।।३।।
    प्रकृतिला अन्य जाती प्राप्त होणे म्हणजे एक देह जाऊन अन्य देह प्राप्त  होणे किंवा दुसरा कोणताही आपूर (पूर्णता, परिपक्कता) प्राप्त होणे  या परिणामाला धर्मादिक निमित्त प्रयोजक हेतू नाही कारण प्रकृतिचा स्वभावच परिवर्तन पावण्याचा आहे. मग धर्मादिक निमित्तांची काय गरज? तर धर्मादिक निमित्त प्रकृतिवरील आवरणांचा नाश करते. याला द्दष्टान्त शेतक-याचा आहे.  जसा शेतकरी पाणी वाहण्याच्या मार्गातील अ़डथळे  दूर करतो पण पाणी मात्र त्याच्या वाहण्याच्या धर्मानेच शेतकरी ज्या ज्या  आळ्यांत (खाचरांत) ते पाणी नेईल तिकडे जाते. तसे धर्मादिक हे प्रकृतीला परिणामासाठी प्रेरक नसुन ते फक्त आवरण दूर करतात. व प्रकृती स्वभावतःच जात्यन्तर परिणामाला पावते. धर्माचे आवरण निघून जसे प्रकृतिचे शुद्ध परिणाम होतात त्याचप्रमाणे अधर्माने प्रकृतिचे अशुद्ध परिणाम होतात. म्हणजेच वाईट जन्म मिळतो.

                निर्माणचित्तान्यस्मितामात्रात् ।।४।।
    योग्याने निर्माण केलेल्या अनेक शरीरांसाठी  अस्मितेच्या योगानेच अनेक चित्ते उत्पन्न होतात. 'योगिनः चित्तानि मूलकारणादस्मिमात्रादेव युगपत्परिणमन्ति।'

              प्रवृत्तिभेदे प्रयोजकं चित्तमेकनेकेषाम्।।५।।
    वेगवेगळ्या शरीरांतील चित्तांना कार्यांत प्रवृत्त करणारे असे एकच  अधिष्ठातृरूपाने असलेले  योग्याचे चित्त प्रेकर असते. एकच चित्त योगमायेमुळे निर्माण केलेल्या अनेक शरीरातील चित्तांना प्रेरक होते.  'तेषामनेकेषां चेतसां व्यापारनानात्व एकं योगिनश्चित्तं प्रेरकमधिष्ठातृत्वेन । तेन न भिन्नमतत्वम्। यथा == त्मीय शरीरे मनश्चक्षुः पाण्यादीनि यथेच्छं प्रेरयति अधिष्ठातृत्वेन तथा कायान्तरेष्वपि ।' 
   
        तत्र ध्यानजमनाशयम् ।।६।।
 इच्छा निर्मित अनेक चित्तांना प्रेरक असे अधिष्ठातृत्व  रूपनाने असलेले योग्याचे चित्त त्यास ध्यानज चित्त म्हणतात. त्या चित्ताला  रागादि प्रवृत्ती नसल्यामुळे ते कर्म वासनारहित असते.
  
          कर्माशुक्लाकृष्णं योगिनस्त्रिविधमितरेषाम् ।।७।।
    कर्माच्या चार जाती आहेत: शुक्लकर्म, कृष्णकर्म, शुक्लकृष्णकर्म, अशुक्ल अकृष्णकर्म. योग्यांचे अशुक्ल  अकृष्णकर्म असते. सर्व कर्मांच्या फलांचा त्याग केला असल्यामुळे त्यांचे कर्म अशुक्ल व कोणताही भावी परिणाम होत नसल्याने ते कर्म कशाचेही उपादन कारण नसते म्हणून अकृष्ण कर्म असते. इतरांची कर्मे बाकी तीन प्रकारची असतात. शुभ फल देणारेजे कर्म त्यास शुक्ल कर्म म्हणतात. दान, तप स्वाध्यादि कर्म करणा-या परूषांचे शुक्लकर्म असते त्यापासून शुभ फल प्राप्त होते. पापाचरणी पुरूषांचे कृष्णकर्म असते त्य़ापासून नरकलोक  प्राप्त होतो.  काहींची काही चांगली व काही वाईट कर्मे असतात. त्य़ापासून मिश्र फळ मिळते.  
योगसूत्र कैवल्यपाद
    ततस्तव्दिपाकानुगुणानामेवाभिव्यक्तिभिव्यक्तिर्वासनानाम् ।।८।।
    शुक्ल, कृष्ण व शुक्लकृष्ण या तीन प्रकारच्या कर्मांचा विपाक (फल देणय्याची प्रवृत्ती) त्या विपाकाला योग्य अशा ज्या वासना त्या वासनांची अभिव्यक्ति होते. 'यज्जातीयस्य कर्मणो यो विपाकस्तुस्यानुगुणा या वासनाः कर्मविपाकमनुशेरते तासामेवाभिव्यक्तिः।'

            जातिदेशकालव्यवहितानामप्यानन्तर्यं स्मृतिसंस्कारयोरेकरूपत्वात् ।।९।।
      जीव हा एका योनीतून दुस-या योनीत अशा  रीतीने नाना योनींत जरी भ्रमण करीत असला व नाना प्रकारच्या जातीत जन्म घेणे , वेगवेगळ्या देशांत व कालांत जन्माला येणे असे एक जन्म व दुसरा जन्म यांत जातिदेशकाल यांचे जरी व्यवधान असले तरी स्मृती व संस्कार एकरूप असल्याने फलानुसंधानाचे नैरन्तर्य राहाते. ज्याप्रमाणे वासनासंस्कार  असतील  त्याप्रमाणे  स्मृतीसंस्कार  उत्पन्न होऊन  कर्म घडते. त्यांचे संस्कार  पुनः पुनः  चित्तावर राहतात. असा स्मृतीसंस्काराचा  अखंडितपणा. स्मृतीची  व्याख्या 'संस्कार मात्र जन्यं ज्ञानं स्मृतिः । संस्काराची व्याख्या ,'संस्कारो हि नाम गुणाधानेन भवति दोषापनयनेन वा।' (शंकराचार्य) शिवाय 'अनुभवजन्यास्मृतिहेतुर्भावना। आत्ममात्रवृत्तिः । असे भावनेचे वर्णन तर्कसंग्रहात आहे. यावरून स्मृती संस्कार एकरूप असून त्यांचा अखण्डितपणा कधीच तुटत नाही व कोणत्याही जातिदेश कालाच्या व्यवधाने तो बाधित होत नाही , तर योग्य वेळी स्मृतिसंस्करा उदय पावून कर्म घडते व तदनुरूप फलप्राप्ती होते.
   
                           तासामनादित्वमाशिषो नित्यत्वात् ।।१०।।
      स्मृतिसंस्काररूपाने असणा-या ज्या वासना  त्या अनादि आहेत. कारण इच्छा ही नित्य असते. मी नेहमी सुखी असावे , सुखापासून  माझा वियोग होऊ नये ही इच्छा नित्य  असते, 'आशिषो नित्यच्वात्= ये यमाशीर्महामोहरूपा सदैव सुख साधनानि मे भूयासुर्मा कदाचन तैर्मे वियोगोभूदित यः संकल्पविशेषो वासनानां कारणं तस्यनित्यत्वात्; अनुभवसंस्काराद्यनुविद्धं संकोचविकाशधर्मि चित्तं तत्तदभिव्यञ्ञक विपाक लाभात् तत्तत्फलरूपतया परिणमते।'

                 हेतुफलाश्रयालम्बनैः संगृहीतत्वादेषामभावे तदभावः ।।११।।
      वासनांचा संग्रह कसा होतो व त्यांचा अभाव कसा होतो, त्या नाहिशा कशा होतात हे या सूत्राने  स्पष्ट करतात. अविद्या हा हेतू; विशिष्ट शरीर, स्मृती संस्कार हे फल ; बुद्धीसत्त्व हे आश्रय व विशिष्ट शब्द , स्पर्श, रूप, रस, गन्धादिक भोग हे  आलम्बन यामुळे वासनांचा संग्रह होतो. अविद्यादिक हेतु स्मृती संस्कार फळ, बुद्धिसत्त्व आश्रय व बाह्य भोग हे आलम्बन या सर्वांचा अभाव झाला असतां अभाव होतो.'मनस्तु साधिकारमाश्रयो वासनानाम्। नह्यवसिताधिकारे मनसि निराश्रया वासनाः स्थातुमुत्सहन्ते। यदभिमुखी भूतं वस्तु यां वासनां व्यनक्ति  तस्यास्तदालम्बनम् ।  एवं हेतु फलाश्रयालम्बनैरेतैः संगृहीताः सर्वा वासनाः। एषाणभावे तत्संश्रयाणामिपि वासनानामभावः।' जेव्हा मन भोगाच्या कार्यांत प्रवृत्त असेल तेव्हा ते वासनांना आश्रय असते. जेव्हाते कशातही प्रवृत्त नसेल तेव्हा आश्रय नसलेल्या  मनाचा अवलम्ब वासना करू शकत नाही. प्रवृत्त झालेले मन ज्या  वस्तुकडे धाव  घेईल त्या संबंधीची वासना त्या मनात राहिल. या रीतीने सर्व वासना हेतुफलाश्रयालम्बन यांच्या आधारानेच राहतात. या चौघांचा अभाव असला  तर तदनुष्ठित वासनांचाही अभाव असतो.

                   अतीतानगतं स्वरूपतो=स्तत्यध्वभेदाध्दर्माणाम्।।१२।।
      धर्माणां वासनानां परिणामो=ध्वभेदादतीतरूपेणा=स्ति। अनागत रूपेणवा=स्ति स्वरूपतो=स्ति।'
वासनांचे तीन मार्ग कल्पिले आहेत. काही वासना अनुभूत विषयामुळे अतीत (स्वव्यापारोपरत) होतात. काही वासना भविष्यकाळी योग्य सामग्रीने अभिव्यक्त होणा-या असतात त्या अनागत वासना. काही वासना स्वव्यापारोपारूढ म्हणजेच 'स्वरूपतः असणे' अशा असतात या तीन मार्गानी वासनांचे अस्तित्व असतेच.
 
           ते व्यक्तसूक्ष्मा गुणात्मानः ।।१३।।
    ते वासनांचे वर्तमान स्थितीत व्यक्त असतात व अतीत आणि अनागत स्थितीत सूक्ष्म रूपाने असतात. ह्या सर्व वासना व त्यांचे व्यक्ताव्यक्त धर्म सत्त्वरजतम गुणांचेच प्रगट स्वरूप असल्याने वास्तविकरित्या या वासना व त्यांचे धर्म गुणस्वरूपच असतात. 'सर्वमिदं गुणांना संविशेष विशेषमात्रमिति परमार्थतो वासनातद्धर्माणाम्।'

      
             परिणामैकत्वाव्दस्तुतत्तवम् ।।१४।।
     प्रख्या ,क्रिया, स्थिती असे जे सत्त्व , रज व तम गुण आहेत त्यांचा करणरूप व ग्राह्यरूप असा एकच (सारखा) परिणाम दिसतो. जसे श्रोत्र हे इंद्रिय, शब्द हा विषय व आकाश हे स्थुल स्वरूप ;त्वक् हे इन्द्रिय, स्पर्श हा विषय व वायु हे स्थूलस्वरूप; चक्षु हे इन्द्रिय, रूप हा विषय व तेज हे स्थूल स्वरूप; जिह्व हे इन्द्रिय, रस हा विषय व आप हे स्थूल स्वरूप; घ्राण हे इन्द्रिय, गन्ध हा विषय, पृथ्वि हे स्थुल स्वरूप. अशा रीतीने प्रकृतिपासून होणा-या या परिणामाची एकरूपता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व परिणामाला वस्तुतत्त्वता आहे. It has objectivity and at the same time objective vaildity. परिणामला वस्तुसत्यता असल्यामुळे प्रकृतिचा जो भूत, भौतिक पसारा आहे तो सत्य आहे. या सूत्रांत पतज्जली मुनींनी सांख्यांचा सत्कार्यवाद एवं सत्ख्यातिवाद यांचा अंगीकार केला आहे व विज्ञानास्तित्ववादि आणि शून्यवादी या बौद्धांच्या मतांचे खंडन केले आहे. विज्ञानवादी बौद्धांची प्रक्रिया अशी आहे. ' विज्ञानवादिबौद्धानाम् आत्मख्यातिः। बुद्धिरेव रजतरूपेणावभासते। न तत्र विषयान्तरापेक्षा। प्रयोगश्च, विमतं रजंतं बुद्धिरूपं, चक्षुरादि संप्रयोगमन्तरेणापरोक्षत्वात्संमतबुद्धिवदिति विज्ञानवादिनो बौद्धाः।' शून्यवादि बौद्धांची प्रक्रिया अशी-
'शून्यवादी बौद्धानामसत्ख्य़ातिः । असत् ख्यातिर्नाम असतो रजतादेः ख्यातिः प्रतीतिरिति शून्य वादिनो बौद्धः।' विज्ञानवादी व शून्यवादी बौद्धांच्या मते बाह्य वस्तुंना सत्य अस्तित्वच नाही व विज्ञानवादी बौद्ध संस्कारएकत्व असल्यामुळे बुद्धिचाच बाह्य वस्तुच्या रूपाने अविर्भाव होतो असे मानतात. तथापि 'परिणामाला  वस्तुतत्त्व आहे', 'It has objectivity and objedtive validity '   असे सांगून सांख्यवादी यांचे खण्डन करतात.

                           वस्तुसाम्ये चित्तभेदात्तयोर्विभक्तः पन्थाः ।।१५।।
     बाह्य वस्तु एका चित्ताचा परिणाम नाही किंवा  अनेक चित्त परिकल्पित म्हणूनही तिला अस्तित्व नाही तर बाह्य वस्तुस स्वप्रतिष्ठेमुळे अस्तित्व आहे. व स्वप्रतिष्ठेमुळे तिच्यात साम्य आहे म्हणजे ती सर्वांना सारखी दिसते. वस्तुस जरी स्वप्रतिष्ठा आहे(objectivity and objective validity) तरी चित्तामध्ये असलेल्या विविध संस्कारामुळे त्या वस्तुपासून कोणास सुख होते, कोणास दुःख होते तर कोणी उदासीन राहातो. असे जे वस्तुमुळे निरनिराळे पन्थ (आघात) चित्तावर होतात ते चित्ताच्या विविध वासनाधर्मामुळे होतात.
योगसूत्र कैवल्यपाद
    
              न चैकचित्ततन्त्रं वस्तु तदप्रमाणकं तदा किं स्यात्।।१६।।
    वस्तुची प्रतिष्ठा कोणत्याही एका चित्ततन्त्रावर कधीच नसते. जर चित्तावर वस्तुची प्रतिष्ठा अवलंबून असेल तर जेव्हा चित्त अन्यत्र व्यग्र असेल अगर  समाधिअवस्थेत निरूद्ध असेल अगर मूर्च्छावस्थेत त्याच्या स्वभावांत नसेल तर त्या चित्ताच्या नसण्यामुळे ती वस्तु अप्रमाण होणार आहे का? याचे उत्तर 'मुळीच नाही असे  आहे. वस्तुंची सत्यता (असणेपणा) चित्ताच्या तन्त्रावर नसुन स्वप्रतिष्ठेवर आहे. 'स्वतन्त्रो=र्थः सर्वपुरूषसाधारणः स्वतंत्राणि च चित्तानि प्रतिपुरूषं प्रवर्तन्ते। तयोः संबंधादुपलब्धि पुरूषस्य भोग इति।'

              तदुपरागापेक्षित्वाच्चित्तस्य वस्तु ज्ञाताज्ञातम्।।१७।।
      उपरागः =आकार समर्पणम् । जी बाह्य वस्तु आहे तदाकार चित्त होणे ही अपेक्षा वस्तुंचे ज्ञान होण्याला असते. जर चित्त तदाकार झाले नाही तर ती वस्तु अज्ञात राहाते. याचा अर्थ  असा, वस्तुशी जर चित्ताचा इन्द्रिय प्रणालीने संबंध आला नाही तर चित्ताला आघात करील तेव्हाचित्त  तदाकार होते व मग चित्ताला त्या वस्तुचे ज्ञान होते. 'तस्यार्थस्योपरागादाकारसमर्पणाच्चित्ते बाह्यं वस्तु ज्ञातमज्ञातम भवति। व्यक्तिरिक्तस्यार्थास्य सम्बन्धाभावादग्रहीतुमशक्यत्वात्। ततश्च येनेवार्थोनास्य ज्ञानस्य स्वरूपोपरागः कृतस्तमेवार्थं ज्ञान व्यव्हारयोग्यातां नयति । ततश्च सो=र्थो ज्ञात इत्युच्युते । येन चा=कारो न समर्पितः स न ज्ञातत्वेन व्यवहि्यते।' 
   योगसूत्र कैवल्यपाद
     सदा ज्ञाताश्चित्तवृत्तयस्तत्प्रभोः पुरूषस्य़ापरिणामित्वात् ।।१८।।
        जसे चित्त बाह्य वस्तुच्या आकाराने परिणाम पावते तसा पुरूष हा परिणाम पावत नाही. पुरूष हा अपरिणामी असल्याने त्या पुरूषाला चित्तवृत्ति ह्या नेहमी ज्ञात असतात. चैतन्यस्वरूप पुरूष हा नेहमी अधिष्ठाता आहे. त्यामुळे चित्तवृत्तिचे त्याला नेहमी ज्ञात होते.

             न तत्स्वाभासं दृश्यत्वात् ।।१९।।
    ते चित्त स्वतःच प्रकाशित करू शकत नाही ते चित्त पुरूषाकडून जाणले जाते कारण ते चित्त देखील इन्द्रिय व वस्तुप्रमाणे जड अत एव दृश्य आहे. 'तच्चित्तं स्वप्रकाशकं न भवति। पुरूषवेद्यं भवति दृश्यत्वात् घटवत्। दृश्यं च चित्तं तस्मान्न स्वप्रकाशकम्।'

         एकसमये चोभयानवधारणम् ।।२०।।
    या सूत्राने क्षणिकवादी बौद्धांचे खण्डन केले आहे. बौद्धांच्या मते चित्त ज्या क्षणी वस्तुच्या आकाराचे होण्याच्या क्रियेत असते त्याच क्षणी ते पूर्णवस्तुच्या आकाराचे होते व त्याच क्षणांत ते आपणास प्रकाशित करते.म्हणजे क्रिया, ,क्रियाफल व क्रियेचे कारकत्व 'स्वःला प्रकाशित करणे' ह्या तिन्हीही गोष्टी एकाच क्षणाला होतात असे त्यांचे मत आहे. 'क्षणिक वादिनो यभ्दवनं सैव क्रिया तदेव च कारकत्वम् ।तथा चोक्तं वैनाशिकैः भूतिर्य़षां क्रियासैव कारकं सैवचोच्यचे।'
            या बौद्ध प्रक्रियेला वरील सूत्राने उत्तर देतात, 'चित्त ज्यावेळी वस्तुच्या आकाराचे  होते त्याच वेळी ते स्वतःला प्रकाशित करू शकत नाही. हे दोन्ही  व्यापार भिन्न असल्यामुळे एकाच क्षणाला ते होऊ शकणार नाहीत.
      अर्थाला जाणणे म्हणजे सुखदुःखरूप हेतूच्या व्यव्हाराला योग्य असे त्यांचे ज्ञान करून घेणे आणि बुद्धिचे तदाकार परिणत होणे  ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी विरोधी व्यापारामुळे संभवत नाहीत.

          चित्तान्तदृश्ये बुद्धिबुद्धेरतिप्रसग्ङः स्मृतिसंकरश्च ।।२१।।
    दृश्य जे चित्त त्या चित्ताला जाणणारा अपरिणामी पुरूष आहे असे  न मानता निराळे चित्तच 'वस्तू आकार परिणाम पावणा-या' प्रथमचित्ताला जाणते किंवा बुद्धिला जाणणारी एक निराळी बुद्धिच आहे असे मानले तर अतिप्रसंग म्हणजे अनवस्था प्रसंग होईल. 'अनेक चित्त व अनेक बुद्धी मानाव्या म्हणजे लागतील व स्मृतींचा संकर होईल.'संसेकारमात्रजन्यं ज्ञानं स्मृतिः' अशी स्मृतिची व्याख्या आहे. चित्ताला अगर बुद्धिला ग्रहण करणारे दुसरे अशा रितीने अनेक चित्त किंवा अनेक बुद्धी मानल्या तर त्या  प्रत्येकावरील असंख्य संस्कार एकाच वेळी उत्पन्न झाली याचे ज्ञान न झाल्यामुळे स्मृतींचा संकर होईल.

           चितेरप्रतिसंक्रमायास्तदाकारापत्तौ स्वबुद्धीसंवेदनम्।।२२।।
  
पुरूष हा चैतन्यस्वरूप आहे त्यासच 'चित्त शक्ती' म्हणतात. ही अप्रतिसंक्रमा आहे. अप्रतिसंक्रमा म्हणजे जी परिणाम पावत नाही अशी 'न विद्यते प्रतिसंक्रमो=न्यत्र गमनं यस्याः सा। अन्येनासंकीर्ण।' बुद्धी ही ग्राह्याकार होते व तशी ग्राह्याकार झालेली  बुद्धी जेव्हा चैतन्य संलग्न होते. त्यावेळी चैतन्यशक्तिने बुद्धी वृत्तिकार स्वरूपाची चितशक्तिला जाणीव करून देते. म्हणजे स्वप्रतिष्ठिता। तत्सन्निधाने यदा बुद्धिश्चेतनेवोपजायते तदा चिच्छक्तिबीद्धित्तिविशिष्टतया संवेद्यते। तदनंतरं बुद्धेः स्वस्या==त्मनो वेदनं भवतीत्यर्थः।'

                   द्रष्ट्टद्दश्योपरक्तं चित्तं सर्वार्थम् ।।२३।।
 चित्त हे द्रष्टा जो पुरूष त्याच्याशी उपरक्त असते तेव्हा ते पुरूषाकार होते तसेच ते दृश्याला ग्रासणारे म्हणजे दृश्याकार होणारे आहे. म्हणून चित्त हे सर्वात्मक होऊ शकते. जे ग्रहण  करण्याची इच्छा चित्तास होईल, तदाकार चित्त होते. म्हणून चित्तांत सर्वार्थ ग्रहण करण्याची  शक्ति आहे.

                 तदसंख्येवासनाभिश्चित्रमपि परार्थं संहत्यकारित्वात् ।।२४।।
     'सहंत्यकारित्वं नाम मिलित्वा=र्थक्रियाकारित्वम्।' संहत्यकारित्व म्हणजे एकत्र मिळून क्रिया करण्याची शक्ति. चित्त हे असंख्य नानाप्रकारच्या वासनांनी  चित्रविचित्र स्वरूपाचे  जरी असले तरी  ते दुस-यासाठी  आहे. सुखरूप चित्त अथवा ज्ञानरूप चित्त अनुक्रमे पुरूषाच्या भोगासाठी व मोक्षासाठी आहे. 'संहत्यकारिणां चित्तेन न स्वार्थन भवितव्यं न सुखचित्तं सुखार्थं न ज्ञानं ज्ञानार्थमुयमप्येतत्पुरूषार्थम्।' जसे नाना प्रकारच्या वस्तुंच्या संहतिमुळे , एकत्र येऊन उपयोगी पडण्यामुळे बनलेले घर हे त्याच्या स्वतःसाठी नसून दुस-यासाठी  (त्या घरांत राहणा-या पुरूषासाठी) असते, त्याचप्रमाणे चित्त हे पुरूषासाठी असते.

     विशेषदर्शिन आत्मभावभावना निवृत्तिः ।।२५।।
   पूरूषाचा चित्ताशी संयोग असल्यामुळे मा कर्ता, मी ज्ञाता या अज्ञानामुळे पूरूष हा मी भोक्तृ असा अभिमान बाळगतो. जेव्हा मी चित्ताहून अगदी भिन्न आहे असे विशेष 'निःसन्दिग्ध बाळगतो. जेव्हा मी चित्ताच्या अगदी भिन्न आहे असे विशेष 'निःसन्दिग्ध' दर्शन पुरूषास होईल त्यावेळी पूरूषाची आत्मभावना (स्वभावना) निवृत्त होईल. आत्मभावभावना म्हणजे मी कर्ता, मी ज्ञाता, मी भोक्ता असा अभिमान. चित्त पुरूषाहून वेगळे आहे. हे विशेष दर्शनदेखील जेव्हा होते त्यावेळी 'निःसंगोह्ययम् पुरूषः।' असे निःसंगत्वच केवळ उरते . हेच कैवल्य सत्स्वरूप ज्ञानाची  पराकाष्ठारूप जी भावना ती देखील कैवल्यांनंतर नाहिशी होते.

       तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम् ।।२६।।
    जेव्हा विशेषदर्शी योग्याची आत्मभावभावना नाहिशी होते तेव्हा त्याचे चित्त विवेकाने (पुरूषापासुन दृश्य, चित्त वगैरे अगदी भिन्न आहे या  विवेकाने ) नम्र झालेले एवं कैवल्याच्या ओघाने (भराने) भारलेले असते.

       तच्छिद्रेषु प्रत्ययान्तरणि संस्कारेभ्यः ।।२७।।
     जरी चित्त कैवल्याच्या ओघाने भारलेले असते तरी मधून-मधून त्या  ओघात पूर्वीचे संस्कार असल्यामुळे काही अन्तराळ (पोकळ जागा अगर मधला वेळ) राहतात व त्या ओघात क्वचित खंड पडतो. हीच त्या समाधी अवस्थेतील छिद्रे आहेत. या मधल्या वेळात पूर्वसंस्कारापासून व्युत्थानाकडे नेणा-या अन्य जाणीव (अनुभव अथवा कल्पना) उत्पन्न होतात.

              हानमेषां क्लेशवदुक्तम् ।।२८।।
    मधून मधून हे जे अन्य प्रत्यय (अनुभव) संस्कारामुळे उत्पन्न होतात, यांचादेखील त्याग करावयास पाहिजे. जसे ध्यानाने क्लेशांचे हान (त्याग) करावयाचे असते तसेच ध्यानाने प्रत्ययान्तराचे देखील हान करावे . सूत्र २.३ मधे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पाच क्लेश म्हणून सांगितले व सूत्र २.११मधे क्लेश वृत्तिंचे हान करावे असे सूचित केले. त्याचप्रमाणे संस्कारापासून उत्पन्न होणारी जी प्रत्ययान्तरे आहेत, त्यांचेही हान (त्याग) ध्यानाने करावे.

         प्रसंख्याने=प्यकुसीदस्य सर्वथा विवेकख्यातेधर्मर्ममेघः समाधिः ।।२९।।
      'प्रसंख्यानं यावतां तत्त्वानां यथाक्रमं व्यवस्थितानां परस्परविलक्षणस्वरूप विभावनम्।' जेवढी तत्त्व आहेत त्या सर्वांचे यथाक्रम व त्यांच्या एकमेकाहून भिन्न स्वरूपाचे योग्य ज्ञान होणे यास प्रसंख्यान म्हणतात. 
       अकुसीद= पलाकाक्ष्ङा न बाळगणारा, विरक्त. अशुक्ल कर्म जास्त आहेत असे धर्म. ही धर्माची सर्वांत उत्कृष्टावस्था. हे  धर्म परमपुरूषार्थाचा म्हणजेच ' कैवल्याचा' वर्षाव करतात. असा वर्षाव ज्या अवस्थेत होतो त्यास धर्ममेघ समाधी म्हणतात. यथाक्रम सर्व तत्त्वांचे ज्ञान झाले असता सुद्धा जो फलाकाक्ष्ङारहित असतो अशा योग्याला विवेक ज्ञानामुळे धर्ममेघनामक समाधिचा सहज निवृत्ती होते.
 
          तदा सर्वावरणमलापेतस्य ज्ञानस्या==नन्त्याज्ज्ञेयमल्पम् ।।३१।।
       क्लेशकर्म निवृत्ती झाल्यावर सर्व आवरणरूपी मल (क्लेश व कर्म यांचे संस्कार) नाहिसे होऊन अनन्त ज्ञान प्रगट होते व त्या ज्ञानापुढे ज्ञेय अत्यन्त अल्प वाटते.  हे सूत्र पतज्जलीचे वाटत नाही व क्षिप्त (Interpolated) वाटते. हे सूत्र कोणत्याही  अर्थाचा बोध करीत नाही. अत एव अर्थशून्य आहे. वास्तविक सूत्र ४.३० व सूत्र ४.३२ मिळून 'ततःक्लेशकर्मनिवृत्तिः कृतार्थानां परिणाम क्रमसमाप्तिर्गुणानाम्' असे एक सूत्र पूर्ण अर्थाचा बोध करणारे होते पण सूत्र पुन्हा एकदा 'ततः हा एक शब्द घालूनया  एका सूत्राची दोन सूत्र करून मधेच ४.३१ हे सूत्र घुसविले आहे. असे प्रस्तुत लेखकाचे म्हणणे आहे.
         सूत्र ४.३१ मधे पुढील  प्रमाणे दोष आहेत. ज्ञेयाचेच ज्ञान होत असल्याने ज्ञेय अल्प व ज्ञान विभू असे कधीच होणार नाही. ज्ञेय व ज्ञान यांची व्याप्ती सारखी असेल. पण ज्ञेय हे मात्र कधीच अल्प होणार नाही. जसे 'प्रमेयत्व' (समजणेपणा) व अभिधेयत्व ( शब्दाने संबोधणेपणा) यांची व्याप्ती सारखीच आहे तशीच ज्ञेय  व ज्ञान यांची सारखी व्याप्ती आहे. ज्ञेय असेल तर ज्ञान होईल म्हणून ज्ञेयाला 'अल्पत्व' देणे हा प्रथम दोष दुसरा म्हणजे सर्व आवरणरूपी मल नाहिसे झाल्यावर ज्ञानाचे आन्नत्य प्रकट होत नसून सूत्र २.२४ 'तस्य हेतुरविद्या' मधे जे अविद्येचे प्रतिपादनकेले ती अविद्या नाहिशी होऊन सूत्र२.२५ 'तद
भावत्संयोगाभावो हानं दृशेः कैवल्यम्' मधे अविद्येच्या अभावामुळे जी कैवल्य प्राप्ती होते. याचा परिणाम म्हणजे हा दुसरा दोष . सूत्र ४.३१ या दोन दोषांनी युक्त आहे व आतापर्यन्त पतज्जलीने एकही दोषयुक्त सूत्र रचिले नाही म्हणून हे सूत्र क्षिप्त (
Interpolated) वाटते.
          या सूत्राचा अर्थच लावायचा तर तो असा लावता येईल की संसारावस्थेत ज्ञान अल्प असून ज्ञेय हे विभू आहे. पुरूष जीवदशेत असता सर्व ज्ञेयाचे ज्ञान जीवाला अशक्यच. पण जेव्हा जीव पुरूषदशेला जातो, अर्थात् मूळ प्रकृतिपासून आपणाला भिन्न जाणतो तेव्हा 'प्रकृतिं पश्यति पुरूषः प्रेक्षकवदास्थितः स्वच्छः।। या कारिकेनुसार निर्मळ असा पुरूष भोगापवर्गरूपप्रसवशून्य अशा प्रकृतिस अशा प्रकृतिस पाहतो व त्या पूर्णज्ञानसंपन्न पुरूषास ज्ञेय जी प्रकृती  ती अल्प म्हणजेच तुच्छ वाटते व त्यामुळे प्रकृतिचा सहज उपरम होतो.

       ततः कृतार्थानां परिणाम क्रमसमाप्तिर्गुणानाम् ।।३२।।
           सर्व क्लेश व कर्मरूप मलाचे आवरण नाहिसे झाल्यावर पूरूषाला अपवर्गरूप अर्थाची प्राप्ती झाल्यामुळे सत्त्व, रज व तम हे गुण कृतार्थ होतात.
      त्यांना पूरूषाला अधिक काही साधून द्यावयाचे राहात नाही म्हणून त्या गुणांच्या परिणामक्रमाची समाप्ती होते. त्या गुणांचा अन्य भोगरूपी परिणाम होत नाही. परिणामक्रमाची समाप्ती होते. त्या गुणांचा अन्य भोगरूपी परिणाम होत नाही. परिणामक्रमसमाप्ति म्हणजे काय हे सूत्र ४.३३ ने स्पष्ट करतात.

               क्षण प्रतियोगी परिणामापरान्तिर्ग्राह्यः क्रमः ।।३३।।
     क्रमाची दोन लक्षणे आहेत. एकतर क्रम हा क्षणयोगी आहे व दुसरे  लक्षण म्हणजे परिणामाचा जो शेवट त्याने क्रम कळतो. एका क्षणाला क्रम होत नाही. क्रम होण्यास क्षणांचा समूह ( एक क्षण, दुसरा क्षण, तिसरा क्षण असा समूह) लागतो. म्हणून या क्षण समूहाला क्षणाचा प्रतियोगी म्हटले आहे. परिणाम क्रमः क्षणप्रतियोगी क्षणः प्रतिसम्बन्धी यस्य सः । क्षणप्रचयाश्रय इत्यर्थः न चैकस्यै व क्षणस्यक्रमः। तस्मात् क्षणप्रचयाश्रयःक्रमः । 'क्रमपरिणामाचा जो शेवट तो यामुळे जाणला जातो. प्रत्येक क्षणाला परिणाम बदलत जातो. कापसापासून तन्तु, तन्तुपासून पट ,पटापासूनपरत तन्तु , असा हा परिणामक्रम सारखा क्षणाक्षणाला चालु आहे.  हा गुणांचा परिणामक्रम ज्या योग्यास 'पुरूष प्रकृतिहून अगदी वेगळा आहे' असा विवेक झाला आहे त्याच्यासाठी होत नाही . कारण त्या योग्यासंबंधी गुणांची कृतार्थता झाली असते. क्लेश कर्मांचा संस्कार व वासना यांनी रहित असे विवेकज्ञान ज्या योग्यास प्राप्त झाले आहे  त्या योग्यासाठी गुणांचा परिणामक्रम न होता प्रतिप्रसव होतो. म्हणजे कार्य कारणांत लीन पावते व पुरूषास कैवल्यप्राप्ती म्हणजे स्वरूपप्रतिष्ठा प्राप्त होते हे शेवटच्या सूत्राने सांगतात.
       
         पूरूषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यस्वरूप प्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति ।।३४।।
      ज्या सत्त्व, रज, तम गुणांचे पुरूषासाठी भोग तथा अपवर्गरूप संपूर्ण कार्य झाले आहे असे जे कार्यरूपाने असणारे गुण त्यांचा प्रतिप्रसव होतो. म्हणजे ते कारणांत लीन पावतात. 'प्रतिप्रसवः - स्वकारणे प्रधाने लयस्तेषां कार्यकारणात्मकांनां गुणानाम्।'  हा जो गुणांचा प्रतिप्रसव  यासच कैवल्य म्हणतात. 'यो=यं गुणांना कार्यकारमात्मकांना प्रतिसर्गस्तत्कैवल्यम्।' प्रधानाने वरीलप्रमाणे पुरूषाशी संबंध सोडला की तोच पूरूषाचा मोक्ष . यासच स्वरूप प्रतिष्ठा अथवा चितिशक्ति ही नावे आहेत.

                 येथे पातज्जल योगसूत्राचा चतुर्थाध्यास समाप्त झाला
                   तसेच पातज्जल योगसूत्र  समग्र समाप्त झाले.

                           ।। ऊँ शुभं भवतु ।।
 --------------------------------------------------------------------------









 

कोई टिप्पणी नहीं: