सोमवार, 3 जनवरी 2011

********* आमचे दादा – व्यासपीठ दिवाळी २०१०

आमचे दादा – व्यासपीठ दिवाळी अंक २०१०
(डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री, धरणगांव, यांच्या स्मृतिपरक लेख)


आमचे दादा । खानदेश पंचक्रोशीत त्यांना ‘बळीरामदादा” याच नावाने ओळखत.
माझे आजोबा नाना यांना कीर्तनाची आवड होती व शिक्षकी पिंड होता.
धरणगावला विणकर साळी समाज खूप मोठा होतातिथे नाना व त्यांचे मित्र 
बालाजीनाना कीर्तन करीतत्यामुळे त्या समाजाला दादांची पहिली ओळख 
सदाशिवनानांचा मुलगा एवढीच होती.पुढे बालाजीनानांच्या
वृध्दत्वामुळे त्यांना कीर्तन जमेनाअशात नाना वारले तेंव्हा गावकऱ्यांना हळहळ वाटली की
आता त्यांच्याकडे हुकमी कीर्तन कोण करणारमग दादांनी आश्वासन दिले कि मी काही
कीर्तन करु शकत नाही,पण वर्षातून एकदा एक महिना ज्ञानेश्वरीचे पारायण आणि

विवेचन तुमच्याकडे येऊन करीन.
अशा प्रकारे १९५९ पासून दादांनी वार्षिक ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात ती अंखडपणे १९९८ पर्यत चालली. सबब, सदाशिवनानांचा मुलगा ही ओळख क्रमशः पुसली जाऊन बळीरामदादा ही ओळख कायम झाली. आज एवढ्या वर्षानंतर धरणगावात आम्हा भावंडांसाठी ‘बळीरामदादांची मुलं’ हीच ओळख जास्त लागू आहे. यावरुन दादांचं श्रेय ध्यानात येतं. अन्यथा मोठी मुलगी महाराष्ट्रात आय..एस आणि खुद्द नाशकात कमिशनर, धाकटी मुलगी मनमाड परिसरात नावाजलेली डाँक्टर, मुलगा व सून हे ही आय..एस, असं असूनही ‘त्यांचे वडील’ अशी दादांची ओळख अल्प प्रमाणात व ‘दादांची मुलं’ ही आमची ओळख मोठ्या प्रमाणात राहिली नसती.
खरं पाहिलं तर ज्ञानेश्वरी प्रवचनाखेरीज इतर खूप कारणं होती लोकांनी दादांना ओळखण्याची. ते स्वभावाने प्रसिध्दी पराङ्मुख होते. धरणगावात आठ-दहा घरांचा अग्निहोत्री वाडा होता. त्यामधून माझे नाना (आजोबा) दीडशे वर्षापूर्वी कधीतरी फायनल (म्हणजे सातवी) पास झालेले पहिले विद्यार्थी. तद्वतच सुमारे पाउणशे वर्षापूर्वी मॅट्रिक पास झालेले पहिले विद्यार्थी म्हणजे दादा. इतकेच नव्हे तर गावाबाहेर जाऊन शिक्षणासाठी नाशिक व पुण्याला जाऊन राहिलेले पहिले विद्यार्थी, नंतर बी.ए झालेले पहिले, नंतर एम., नंतर डबल एम., नंतर पीएच.डी. हे सर्व अग्रक्रम दादांकडे होते. एवढ्या शिक्षणानंतर त्यांनी गरज म्हणून बी.टी. (आताचे बी. एड.) पण केले होते. गावात मात्र ‘केवढा शिकि राहिना’ या पलीकडे लोकांना माहित असायचं नाही. पण खानदेश पंचक्रोशीबाहेरील कोकणस्थ मुलीशी विवाह करणारेही पहिले, त्यात ती मुलगी म्हणजे आमची आई मॅट्रिकपर्यंत शिकलेली हादेखील कौतुकाचा विषय होता.
दादांचा खरा पिंड संशोधकाचा होता. त्यावर तत्वज्ञानाची गोडी चढली ती त्यांच्या फिलॉसॉफी विषयामध्ये एम. . करण्यामुळे. पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये संस्कृत विषयात एम. . करताना त्यांना जाणवले कि कॉलेजच्या इंग्रजीतून संस्कृत शिकवण्याच्या अभ्यासपध्दतीने खरे संस्कृत शिकता येणार नाही. म्हणून त्यानी शास्त्रीय पध्दतीने पारंगत झालेल्या विनायक (शास्त्रीबुवा) अर्जुनवाडकरांकडे शांकरभाष्य व इतर कित्येक ग्रंथ शिकून घेतले. बुवांचे धाकटे बंधु श्रीकृष्ण अर्जुनवाडकर यांना पुण्यात सर्वजण संस्कृत, व मराठी व्याकरण तज्ज्ञ म्हणुन ओळखतात. त्यांची व दादांची चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर दादांनी नाशिक येथील एच.पी.टी. कॉलेजमधून फिलॉसफी विषयात एमए केले. त्यानंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये पीएचडीसाठी रजिस्ट्रेशन करून प्रा. वेलणकरांचे मार्गदर्शन पत्करले. त्याच वेळी त्यांना लोणावळा येथील कैवल्यधाम आश्रमाने शिष्यवृत्ती व काम (नोकरी) दिलेले होते. तेथील विद्यार्थ्यांना दादा संस्कृत व वेदान्त शिकवत. एकीकडे दादांनी स्वामी कुवलयानंदांकडे योगासनांचा तसेच स्वयंप्रेरणेने ज्योतिष विद्या शिकून घेतली. दुसरीकडे डॉक्टरेटसाठी वेदांतामधील बुद्धीवाद-प्रामाण्य हा विषय निवडला होता.
दादांच्या संशोधक वृत्तीचा अंदाज येणारी दोन उदाहरणं मला नमूद करावीशी वाटतात. एकदा तुम्ही कुंडलीवरून फलित कसे सांगता, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, ज्याप्रमाणे एखाद्या रोगाचे लक्षण पाहिल्यावर त्या डॉक्टरला आधी तपासलेले त्याच रोगाचे कित्येक पेशंट आठवतात, त्याचप्रमाणे माझे असते. लग्नस्थानी मीन राशीचा गुरू असं एखाद्या पत्रिकेत दिसल्याबरोबर मला त्याच वर्णनाच्या आधी पाहिलेल्या कित्येकांच्या पत्रिका आठवतात. त्याचप्रमाणे डॉक्टर जसे तीन- चार लक्षणांचा एकत्र मागोवा घेऊन रोग निदान करतो तसेच कुंडलीतील चार- पाच ग्रहस्थितींचा एकत्रित प्रभाव कसा असेल ते ओळखता यायला हवे. याहीसाठी त्यांचे जे शास्त्र पूर्वासुरींनी लिहून ठेवले आहे त्याचा अभ्यास पाहिजे तसेच पूर्वी पाहिलेल्या पत्रिकांचा अनुभव ध्यानात रहायला हवा. थोडक्यात खूप खूप निरीक्षणं, त्यांची वर्गवारी व ह्यांतून निष्कर्ष अशी ती प्रक्रिया असते. मला आठवले, फिजिक्स म्हणजे माझा विषय असो, अगर संख्याशास्त्र ( स्टॅटिस्टिक्स) असो, तिथेही हेच नियम लागू पडतात.
दुसरे उदाहरण त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे आहे. त्यांच्याकडे जर्मन भाषा शिकण्याची तीन- चार पुस्तके होती. ही कशाला याचे उत्तर विचार करायला लावणारे होते.
काण्ट हा थोर जर्मन तत्ववेत्ता होता व त्याने भारतीय तत्वज्ञानाबद्दलही लेखन केले आहे. त्या लेखनाचे इंग्रजी अनुवाद करताना जर अनुवादकाला देखील भारतीय तत्वज्ञानाची जाणकारी नसेल तर इंग्रजी अनुवादामध्ये काण्टचे विचार नीट उतरणार नाहीत. म्हणून काण्टला मूळ जर्मन भाषेतूनचं वाचले पाहिजे. म्हणून हा भाषेचा अभ्यास. याच न्यायाने त्यांनी ग्रीकांचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी ग्रीक व लॅटिन भाषांचा देखील अभ्यास केला होता. हीच संशोधक वृत्ती आम्हा भावंडांत आणि त्यांच्या नातवंडांतही उतरली आहे, याचा मला विशेष आनंद व अभिमान आहे..
-0-0-0-0-0-0-0-0-
डॉक्टरेट करताना दादा कैवल्यधाम आश्रमाकडून स्कॉलरशिप घेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या लोणावळा व मुंबई शाखेमध्ये त्यांचे सतत जाणे- येणे असायचे. भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू देखील स्वामी कुवलयानंदांकडे येऊन योगासनं शिकत असत. असे काही प्रसंग दादांना आठवत. तिथेच योगासनं शिकणारे ज्येष्ठ सहपाठी श्री. शेवडे एकदा दादांकडे आपल्या मेहुणीचे स्थळ घेऊन आले. परंतु डॉक्टरेट पूर्ण केल्याशिवाय लग्नाचा विचार नाही. सबब, मुलीचा फोटोही पाहणार नाही, असे दादांनी निक्षून सांगितले. श्री. शेवडे देखील तेवढेच खमके होते. दादांना डॉक्टरेट मिळताच त्यांनी पुन्हा बोलणी केली आणि दादांनी देखील हो म्हणून टाकले. अशा प्रकारे अनायासेच त्यांचा लग्नयोग जुळून आला व एकेकाळच्या कुमारी लीला नामजोशी या आता सौ. लीला अग्निहोत्री (माझी आई) झाली. त्याच्या पुढील वर्षात माझा जन्म झाला
याच काळात दादांना पुढील शिक्षण व नोकरीसाठी कोलम्बिया युनिव्हर्सिटी अमेरिका येथील स्कॉलरशिप चालून आली होती. पण एकुलता एक मुलगा गेला तर तिकडचा होऊन राहील म्हणून नानांनी नकार दिला . दादांना सुद्धा त्यांची अवज्ञा करून जावेसे वाटले नाही. त्या काळाची सामाजिक जडणघडण तशीच होती. नानांच्या परीने त्यांची धास्ती बरोबर होती व त्यांची अवज्ञा न करण्याचे दादांचे ब्रीदही बरोबरच होते.
पण दादांच्या पुढच्या पिढीला जगभ्रमणाचे योग आले तेव्हा त्यांनी परोपरीने आमचा उत्साह वाढवला.
-0-0-0-0-0-0-0
डॉक्टरेट नंतरची कैवल्यधाम, लोणावळा येथील नोकरी कदाचित दादांना समाधानाची असेल, पण त्यांच्या उच्च शिक्षणाला अनुरूप नसल्यामुळे ती नोकरी सोडण्याचा कडू- गोड सल्ला त्यांना देण्यात आला व दादा धरणगांवी परत आले. त्यांची पुढील चार वर्षे हलाखीत गेली.
त्या काळात नानांचे लाकूडफाटयाचे दुकान बरे चालायचे. पण दादांचा दुकान सांभाळण्याचा पिंड नव्हता व नानांना पण ते नको होते. नानांचा स्वतःचा शिक्षकी पिंड होता. त्यांच्या काळात त्यांनी हुशार विद्यार्थी, पहिला, व्ही एफ उत्तीर्ण विद्यार्थी व गावातील पीआर हायस्कूलमधील गणितासारख्या श्रेष्ठ विषयाचा शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला होता. मग संपूर्ण परिवाराचा विचार करून शिक्षकाची नोकरी सोडून लाकडाचे दुकान टाकले होते, परंतु दादांनी मात्र शिक्षकी पेशातच रहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. दादांना तर कॉलेज प्राध्यापकाची नोकरी मिळत नव्हती. मग त्यांनी बीटी करून शाळा- शिक्षकाची नोकरी पत्करली. तीही तात्पुरत्या स्वरूपाची व धरणगावपासून दूर व्यारा ( आता गुजरात) व खांडवा ( मध्य प्रदेश ) अशा गावांमध्ये. मात्र त्याच काळात आईने मॅट्रिकच्या पुढील शिक्षण पूर्ण करायचे ठरविले. त्याबाबत दादा व नाना दोघेही उत्साही होते. त्या काळी नागपूरला एसएनडीटी विद्यापीठामध्ये अशी खास सोय होती की, बाहेरून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या महिला त्यांच्या सोयीने परीक्षा जवळ आली असता, दोन-तीन महिने त्यांच्या होस्टेलमध्ये अभ्यासासाठी राहू शकत. या सोयीपोटी मला नानांकडे ठेऊन आई नागपूरला राहू शकत असे. अशा रितीने तिने बीए पर्यंतचे चार वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. तिने निवडलेला एक विषय लॉजिक असा होता जो दादा तिला शिकवत असत. ती चारही वर्षे आई नागपूरला जाऊन रहात असता माझा सांभाळ व शेवटच्या दोन वर्षात मी व धाकटी बहीण असा दोघींचा सांभाळ नानांनी केला.
१९५७ मध्ये दादांना जबलपूर, मध्यप्रदेश येथील हितकारिणी कॉलेजात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली व त्यांचे हलाखीचे दिवस पालटण्याची सुरुवात झाली. त्यांच्या सांगण्यावरून नानांनी लाकडाच्या दुकानातील आपला वाटा काढून घेतला आणि सर्व दुकान भावाकडे सोपवून निश्चिंत झाले.
दादांना सतत नवीन गोष्टी शिकण्याची व नवीन स्थळं पाहण्याची ओढ होती. जबलपूरला आल्यावर त्यांनी सायकल विकत घेतली. ही हर्क्यूलस कंपनीची सायकल त्यांना खूप वर्षे म्हणजे अगदी १९९५ पर्यंत पुरली. त्या काळी हर्क्यूलस सायकलची जाहिरात असायची -- सायकल नाही, जीवनसाथीच. ती दादांच्या सायकलला तंतोतंत लागू पडली. त्या सायकलला समोर एक मोठी बास्केट लावून घेतली होती. व मागे एक सीट. आम्ही मुलं कधी बास्केटमध्ये व मोठेपणी सीटवर बसून त्यांच्यासोबत फिरत असू, त्यांना तेव्हापासून सायकलवर १५-२० मैलांची रपेट मारायची सवय लागली. त्यांच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याच हे ही एक महत्त्वाच कारण होत. मी तर त्यांच्या साय़कलवर आख्खा जबलपूर फिरले आहे. त्यातही भेडाघाटचे धबधबे हे आम्हा दोघांचे आवडते ठिकाण होते. पुढेही आम्ही दादांबरोबर दिल्ली, पंजाब, काश्मीर, कलकत्ता, वाराणसी, गया, अशी कित्येक ठिकाणं फिरलो.
जबलपूरला आल्यावर तीन वर्षांतच त्यांना बिहार प्रांतातील दरभंगा येथे सरकारी नोकरी मिळाली. आम्ही तिकडे गेलो आणि दरवर्षी वारीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगावला येत राहिलो. त्यामुळे प्रवास हा आमचा कायम स्वभाव बनून राहिला. दादा तर प्रवासाबद्दल इतके उत्साही कि अगदी १९९४ मध्ये वयाच्या ७८व्या वर्षी ते व आई माझ्या भावाच्या दोन लहान मुलांना घेऊन इंग्लंडला गेले. भाऊ व वहिनी तिथे आधीच ट्रेनिंगसाठी गेलेले होते. तिथे सहा महिने छान फिरून-बिरून आईदादा परतले. अशा प्रवासाचा त्यांनी कधीच कंटाळा केला नाही. खरं तर त्यांनी कुठल्याच गोष्टीचा कधीही कंटाळा केल्याचं मला आठवत नाही. त्यांचा उत्साह अगदी शेवटपर्यंत टिकून होता. आमच्या घरात व मित्रपरिवारात त्यांचा उल्लेख त ला उ म्हणजे तरूणाला लाजवेलसा उत्साह असा केला जायचा. करून बघावे म्हणून त्यांनी सत्तराव्या वर्षी व पुढे सलग दोनदा धरणगाव ते पंढरपूर अशी पायी वारी पण केली.
-0-0-0-0-0-0-0-
दरवर्षी उन्हळ्याच्या सुट्टीत आम्ही धरणगावी आलो कि दादांकडे भेटायला येणाऱ्या माणसांची रीघ असायची. दादा एक महिनाभर रोज सकाळी दोन तास साळी सामाजाच्या समाज मंदिरात ज्ञानेश्वरीचे प्रवचन करीत असत. हळूहळू त्या जोडीला तुलसी रामायणाची जोड पण देत गेले. त्यामधे हटकून समाज स्थितीचे विवेचन व प्रबोधनही असायचे.
श्रोत्यांपैकी काही मंडळी पुनः भेटीसाठी येत व चर्चा करीत. इतर मंडळी बहुधा ज्योतिषचर्चा व भविष्य विचारण्यासाठी येत. दादा भविष्य सांगण्याची फी घेत नसत आणि कुंडली करून दिली तर त्या पोटी काही तरी मामुली रक्कम घेत. त्यांच्या ज्योतिषाने लोकांना बराच दिलास मिळे. त्यांचे वर्तवलेले भविष्य सहसा चुकत नसे. शिवाय त्यांना मंत्रविद्याही थोडीफार अवगत होती. त्यामुळे एखाद्या संकटावर मंत्र व त्याचा जपविधी सांगत. मात्र मंत्राच्या पलीकडे मणि, खडे, यांवर त्यांची श्रद्धा नव्हती. मंत्रोच्चारामध्ये स्वर कंपनातून शक्ती मिळते.- ती मणि धारणाने येत नाही असं ते सांगत. त्यांना स्वतः छानछोकीने राहण्याची आवड नव्हती. कधी दागिने धारण केले नाहीत किंवा चहा- सुपारी- पानाचे व्यसनही बाळगले नाही.
भविष्य सांगताना दादा बहुधा त्याची कारणीमीमांसा सांगत. गुरू या घरातून त्या घरात जाणार आहे, मंगळ वक्री आहे, किंवा सूर्य-बुधाची युति आहे वगैरे. एकदा त्यांना मी म्हटले, या लोकांना त्यातलं काय कळतं किंवा त्याच्याशी काय देणं- घेणं? मंगळ वक्री का सरळ ते तुम्ही बघा. त्यांना सांगून त्याचा काय उपयोग? त्यांना फक्त फळ सांगा! त्यांना ते नाही आवडलं ते म्हणाले, ज्योतिष हे एक शास्त्र आहे. ती अंधश्रद्धा किंवा खेळ नाही. निव्वळ फळ न सांगता कारण सांगितलं तरच लोकांना हळूहळू समजेल की हे शास्त्र आहे. मुख्य म्हणजे मी जेंव्हा एखादे कारण बोलून दाखवीन, तेंव्हा काही चूक होत असेल तर माझे मला लगेच उमजून येईल. हे ऐकल्यावर मला आठवलं, की मी एखाद्या डॉक्टरकडे जाते तेंव्हा ते जर मला काहीही कारण न सांगता औषध लिहून देऊ लागले तर मला आवडत नाही. मला कांय होत आहे, ते डॉक्टरांनी मला सांगितले तरच ते डॉक्टरी पेशाला धरून असेल असे माझे ठाम मत आहे. तीच वागणूक दादा भविष्याच्या बाबतीत देत होते ना ? मग त्यांचे बरोबरच होते.
भविष्यासाठी दादांकडे सामान्य माणसं तर येतच पण ज्यांना समाजात व्हीआयपी म्हटले जाते असेही खूप लोक येत व पुन्हा पुन्हा येत. कित्येकांशी मैत्रीचे संबंध निर्माण होत असत. सर्वाना दादा म्हणजे योग्य सल्लागार वाटत. कधी कधी नातेवाईक व घरातील आम्ही पण भविष्य विचारत असू. ते उत्तर सांगत, पण ज्योतिषी व्यक्तीने नातेववाईकांचे भविष्य पाहू वा सांगू नये, या सामान्य नियमाची आठवणही करून देत.
-0-0-0-0-0-0-0-
मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत दादा अतिशय जागरूक होते. मुलगी- मुलगा असा भेद आमच्या घरी नसायचा आणि मित्र परिवारांतही कुणी ठेऊ नये हा त्यांचा आग्रह असे. अगदी लहान वयात त्यांनी मला भगवद्गीता व कित्येक स्तोत्रं शिकवली व आमच्याकडून पाठ करुन घेतली. स्वतः देखील नवीनवी स्तोत्रं पाठ करीत असत. शंकराचार्याचे नवे स्तोत्र पाठ करताना त्यांना पंच्याऐंशी वर्षाच्या वयातही त्यांना खूप आनंद वाटायचा. दादा आमच्याकडून योगासनांचा अभ्यास करवून घेत. गणित विषयाचा प्रांत आईकडे सोपवला होता. पण अडचणीच्या वेळी स्वतः घेऊन बसत. उदाहरणार्थ, बीजगणितातील इंडायसेस व सर्ड हे धडे. एखादे पुस्तक शिकवताना आधी त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचायला लावत. पुढे मी पाहिले की ही सवय किती उपयोगी होती. पाश्चात्य पुस्तकांच्या लांबलचक प्रस्तावनेची महत्ता सुद्धा यामुळेच पटली .
आम्ही मुले शाळेत असेपर्यंत दादा नेमाने शाळेत येऊन मुख्याध्यापकांशी चर्चा करून आमचे शिक्षण व्यवस्थित होत आहे ना व शिक्षक समाधानी आहेत ना, याची खात्री करून घेत.
मी आठवीत गेले तसे त्या काळानुरूप विषय निवडीचा प्रसंग आला. माझी मुलींची शाळा होती. तिथे सायन्स शिकण्याची सोय नव्हती. तरी मुख्याध्यापकांना भेटून दादांनी ठरवले कि मला सायन्सला घालायचे. त्या काळी जनरल सायन्स (लोअर लेव्हलचे फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी) हा विषय इतरांना कम्पल्सरी होता. तो शिकवायला एक पार्ट टाईम शिक्षक येत. मला त्यांनी केमिस्ट्री व मुख्याध्यापकांनी गणित शिकवावे असा ठरले. फिजिक्सची जबाबदारी दादांनी उचलली. पण फिजिक्स, केमिस्ट्रीच्या प्रयोगांचे काय? मग थोड्या अंतरावर असलेल्या मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी काढली व त्यांच्या प्रयोगशाळेत मला प्रॅक्टिकल करण्यासाठी जाता आले. त्या काळात शिक्षणाभोवती आजच्या सारख्या उंच उंच मानसिक भिंती नव्हत्या म्हणून सर्वांची मदत मिळून मला सायन्स शिकता आले. आजच्या काळात हजारो नियमांवर बोट ठेवून ही परवानगी कशी देता येणार नाही, ते पाहिले जाते.
त्याच काळात दादांनी मला एक लेडिज सायकल घेऊन दिली व स्वतः मोकळ्या मैदानात नेऊन शिकवली. यानंतर मला सायकलवर शाळेत जाण्यास प्रोत्साहन दिले. साठाच्या दशकातील बिहार हे राज्य स्त्रीसंदर्भात खूप मागासलेले होते म्हणावे लागेल. मुलींची शाळा असणे हीच मोठी गोष्ट होती. मग सायकलवर जाणारी मुलगी हे तर मोठेच अप्रूप होते. ये देख, छोरी साइकिल चलावे छै असं म्हणत बायका-मुले, माणसे थबकून बघत असत. मात्र मला त्रास देण्याची भूमिका नव्हती. पुढील सात-आठ वर्ष मी सायकलवरच शाळा व कॉलेजात जात असे. मी बीएससी पूर्ण करून दरभंगा सोडून गेल्याच्या सुमारे सहा वर्षानंतर दादांच्याच प्रोत्साहनाने दरभंग्यात दुसरी एक मुलगी माझीच सायकल सेकंडहॅण्ड विकत घेऊन व दादांकडूनच शिकून सायकलने शाळेत जाऊ लागली. नाही म्हणायला माझी धाकटी बहीण पण सायकल शिकली. पण मी सायकलवर बाहेर जाणार नाही असे तिने सांगून टाकले तर दादांनी तिच्यावर दबाव आणला नाही. तिला तिच्या मर्जीने वागू दिले. आम्हाला पोहायला शिकता आले नाही याचे त्यांना वाईट वाटायचे. वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मी पुण्यात पोहायला शिकून घेतले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता.
त्यांनी मला फिजिक्स कसे शिकवले असेल? त्यांना तो विषय फक्त मॅट्रिकपर्यतच होता. पण मला पुस्तक घेऊन उच्चारवाने वाचायला लावत. तो भाग समजला, असं मी सांगेपर्यत पुन्हा पुन्हा वाचायला लावत. खोटेपणाने मला समजला असं सांगायची माझी टाप नव्हती. मग मी स्वतःच दिवसभर चिंतन करुन तो विषय समजावून घेत असे. क्वचित शेजारी कुणाची किंवा मुलांच्या शाळेतील मास्तरांची मदत होई. मात्र पुढे कॉलेजात मी लॉजिक हा विषय घेतला तेव्हाचे त्यांचे शिकवणे मला खूप आवडायचे. हा त्यांचा हातखंडा विषय होता. तेंव्हाच मला त्यांच्याकडून तत्वज्ञानातील विषयांची चर्चा करून शिकून घेण्याची संधी मिळाली. कधीकधी ते मला म्हणायचे, तुझे फिजिक्स मला शिकव ना. मग मी त्यांना नवनव्या शोधांबाबत सांगत असे.
माणसाने अंखडपणे शिकत रहावे, असे दादा सांगत. दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे, या ओळी त्यांच्या आचरणाने आमच्यावर बिंबल्या होत्या. कित्येक वाढदिवसांना त्यांनी मला विचारले आहे कि या वर्षी नवे काय शिकणार? आम्हां भावंडांनी किंवा पुढे आमच्या मुलांनी काहीही नवे केले अगर शिकले की त्यांना अपार आंनद होत असे.
माझ्या धाकट्या बहिणीवर त्यांचा विशेष जीव होता. ती लहानपणी बरीच व्याधिग्रस्त असायची. तरी जिद्दीने शिकून तिने डॉक्टरीचा अभ्यास पूर्ण केला. तिचे निदानतंत्र अगदी अचूक आहे. आई-दादांच्या कित्येक आजारपणात तिचेच निदान कामी आले. दोघांच्या एकेका आँपरेशनमध्ये तर ती असल्यानेच प्राण वाचले असे म्हणता येईल. तिच्याकडे पाहून दादा म्हणत पहा, हिला शिकवण्याचे सर्व श्रम व पैसा किती योग्य रितीने कामाला आले.
-0-0-0-0-0-0-0-0-0-
दरभंगा येथील दादांची नोकरी त्यांच्या मनपसंतीची होती. बिहार सरकारच्या मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये एमए च्या विद्यार्थ्याना संस्कृत व तत्वज्ञान शिकवणे व रिसर्च विद्यार्थ्यांना गाइड करणे म्हणजे ग्रंथवाचन, मनन, लेखन, याला भरपूर वेळ मिळण्याची खासी सोयच. त्या काळात त्यांनी बीए च्या विद्यार्थ्याना उपयुक्त ठरतील अशी तीन पुस्तके लिहायला घेतली. कांदबरी-कथासार, नैषध-चरित्र आणि भगवद्गीतेतील बुध्दियोग ही ती पुस्तके. त्यात मूळ श्लोकांचे संस्कृतमध्ये अर्थ व विवेचन, शिवाय इंग्लिश व हिंदी भाषेतून सोपा अर्थ अशी मांडणी होती. पहिले पुस्तक-कांदबरी कथासार हे चौखम्बा प्रकाशनाने छापले पण त्यात त्यांना रॉयल्टी न देता दोनशे प्रती दिल्या. मार्कटिंगच्या तंत्रात दादा पूर्णपणे अनभिज्ञ होते. माझे पुस्तक विकत घ्या, असे एखाद्या लायब्ररी किंवा इन्स्टिट्यूटसना सांगायची त्यांची प्रवृती नव्हती. त्या विवंचनेत इतर दोन पुस्तकं मागे पडली. कित्येक वर्षानंतर दादा पुण्याला येऊन राहिले तेव्हा ते पंच्याहत्तर वर्षाचे होते. त्यानंतर त्यांनी पातंज्जल योगसूत्र, सांख्यकारिका तसेच कठ– माण्डूक्य-श्वेताश्वतर आधरित योगत्रयी अशी तीन पुस्तके लिहिली. मग उत्साहाने कागदांची जुनी बाडं काढून पुन्हा एकदा नैषधचरित्र व भगवद्गीता प्रणित बुद्धियोग ही पुस्तके लिहून पूर्ण केली. ही सर्व पुस्तके प्रकाशनात आली. पुण्यात पुणे मराठी ग्रंथालयाने त्यांचा छोटासा सत्कारही केला. दरभंगा येथे गेल्यापासून त्यांचे स्फुटलेखन अव्याहतपणे चालूच होते. All India Oriental Conference साठी ते निबंध पाठवीत असत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी मासिक, कधी कधी वृत्तपत्रे, कधी आकाशवाणी असे त्यांचे लेख येत राहिले. त्यांचे कित्येक रिसर्च विद्यार्थी असून त्यांना गाइड करण्याच्या ओघांतही बरेच वाचन व लेखन होत असे.
जळगाव आकाशवाणीवर त्यांचे कित्येक कार्यक्रम प्रसारित झाले.
एकदा मी गीतेचा एक अध्याय माझ्या आवाजात रेकॉर्ड करून तो त्यांना ऐकवला. त्यांनी तो नापास केला. अशा वेळी श्लोकांचे उच्चारण किती सहज व विनासायास व्हायला हवे असे सांगत मला त्यांनी दोन श्लोक म्हणून दाखवले. मला कशी सुबुध्दी झाली कि मी लगेच त्यांच्या आवाजात संपूर्ण भगवद्गीता रेकाँर्ड करुन घेण्याचे ठरवले. सर्व पूर्वतयारी करुन त्यांना विमानाने दिल्लीला नेले. त्यावेळी त्यांचे वय एकोणनव्वद. स्टुडियोत त्यांनी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळात एकाच दमात व एकसारख्या ताज्या आवाजात संपूर्ण गीता रेकॉर्ड केली. आता नवीन तंत्रामुळे मला ती यू ट्यूबवर उपलब्ध करुन देता आली आहे.
-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0
आमचं घराणं पूर्ण शाकाहारी. तशात दादांना साधे पानसुपारीचेही व्यसन नव्हते. दागिने, छानछाकी, कॉस्मेटिक्स हा शौकही नव्हता. कपड्यांच्या बाबतीतही फॉर्मल ड्रेस कोडची गरज नसेल तेंव्हा ते फार काळजी बाळगत नसत. मात्र त्यांना निरनिराळे पदार्थ खाण्याचा व बनवण्याचा शौक होता त्यांची आई खूप लहानपणीच वारली. आम्ही तर तिचा फोटोही पाहिलेला नाही. त्यामुळे नानांनी स्वयंपाक शिकून घेतला होता. दादाही त्याच पठडी तयार झालेले. माझी आई पण सुगरण असून एरवी त्यांना स्वयंपाकघरात येऊ देत नसे. मग दुपारी तिची आवराआवर होऊन ती आम्हा मुलांशी बसली कि दादा स्वयंपाकघराचा ताबा घेत. साजूक तुपाचा गोडाचा शिरा हा आवडीचा पदार्थ करून झाला की सर्वांना बळजबरीने आग्रह करून खायला लावणार. साधारणपणे त्यांचे जेवण लवकर असायचे व आमचे आईबरोबर उशीरा. त्यांचा शिरा होईपर्यत त्यांना भूक लागली असायची. पण आम्हाला भूक नाही हे ते ऐकत नसत. इतका छान शिरा असताना नाही कसं म्हणता असा त्यांचा सवाल असे. एरव्ही सुध्दा बासुंदी, श्रीखड, गुलाबजाम आणि लाडू करण्यासाठी त्यांचा पुढाकार असे. त्यांचा शौक व बिहारमध्ये फळांची रेलचेल या दोन गोष्टींचा फायदा आम्हाला पण भरपूर मिळाला. घरात फळं हवीच. मग अगदी करवदे, गावरान बोर पण त्यांना चालत.
-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-
आम्ही दरभंग्याला आलो तेव्हा दादांचं हिंदी मोडकं- तोडकं होतं. त्या मानाने आम्हा मुलांचं हिंदी छानच होतं. एकदा त्यांनी घरी आलेल्या धोब्याला तुम जाओ म्हणजे तू जा, अशा अर्थाचे वाक्य उच्चारले. तो एकदम चिडलाच. अपमान करताय म्हणू लागला. कारण बिहारमध्ये प्रत्येकाला आदरार्थी बहुवचन वापरुन आप जाइये इत्यादी म्हणण्याची पध्दत होती. मग मी पटकन पुढे होऊन त्या माणसाला समजावले कि दादांना हा नियम नाही माहीत तू मनावर घेऊ नको. मग दादांना हिंदी शिकविण्यासाठी आम्ही त्यांना एक गधे की आत्मकथा, एक गधे की वापसी, राग दरबारी आणि लप्टंट (लेफ्टनंटचा अपभ्रंश) पिगसन की डायरी अशी चार विनोदी पुस्तकं दिली. ती अगदी शेवटपर्यंत दादांच्या संग्रहात होती. बरेचदा दादा ती पुस्तक काढून वाचत असत व मनसोक्त हसत. याबाबत त्यांचा स्वभाव लहान बालकासारखा होता. मला म्हणत, कार हळू चालव, पण माझी मुलं ड्रायव्हिंगला बसली की म्हणत, जोरात हाक, ती मागची गाडी पुढे जाता कामा नये. मी या भेदभावाचे कारण विचारले तर म्हणाले कि ती पुढची पिढी आहे, त्यांना जादा वेगाची प्रॅक्टीस हवी.
दादा तसे स्वभावाने कोपिष्ट. पण सगळा राग पटकन मावळणारे व मनात काही न ठेवणारे होते. मुलांबाबत त्यांचा दृष्टिकोन अतिशय उदार व आधुनिक होता. मुलगा-मुलगी हा भेद त्यांच्याकडे नव्हताच पण धर्म व जातिभेदही ते फार मानत नसत. मुले आधुनिक काळाप्रमाणे वागणारच, असं म्हणत ते स्वतःच्या स्वभावाला मुरड घालायचे. एकदा माझे वागणे त्यांना खटकले. त्यांनी फक्त एक श्लोक उच्चारला कि शुद्ध असेल तरी लोकाचरणाविरुद्ध करु नये.
यद्यपि शुद्धं, तदपि विरुद्धं
लोकाचरणं, ना करणीयम्
पण त्या प्रसंगाबाबत काही बोलले नाहीत. नंतर एकदा मी त्यांना आठवण करुन देत म्हटलं, आपलं बरोबर असेल तर लोकांची पर्वा का करायची? ते म्हणाले, बरोबर आहे, ज्यांना लोकांचे नेतृत्व करायचे नसेल, त्यांच्यासाठी ते ठीक आहे. पण ज्यांना लोकांचे नेतृत्व करायचे आहे किंवा ज्यांच्याकडे इतर लोक प्रेरणेसाठी पाहतात त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते की त्यांच्यामुळे अज्ञजनांचा बुद्धिभेद होऊ नये.
बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानाम् कर्मसंगिनाम् ।
तेवढी काळजी घ्यावी. एरव्ही आपल्याला आवडेल तेही करावं. – मनःपूतं समाचरेत्। ज्या कामाबद्दल मनाने खात्री दिली असेल कि हे पवित्र आहे, ते करावे. फक्त एक भेद ध्यानात ठेवावा – मनाने म्हटले पाहिजे की, हे पवित्र आहे - मनाचा कौल जर असेल कि हेच प्राप्त परिस्थितीला धरुन आहे, तर तिथे पावित्र्य असेलच असे नाही.
अशा प्रकारे पुष्कळ नीतिश्लोकांतून प्रबोधन करीत.
मी व धाकटा भाऊ IAS सारख्या उत्तम नोकरीवर लागलो. पण इथेही राजकारण, दबावतंत्र, फेव्हरेटिझम हे आम्हाला सोसावे लागायचेच. अशा वेळी ते म्हणत, हे व्रत म्हणून घेतले असेल तर सुखदुःख, लाभ-हानि, जय-पराजय इत्यादी विचार मनात न आणता काम चोख करणे एवढेच उद्दिष्ट ठेवा. तरी पण आम्हाला आँफिसच्या जबाबदारीमुळे दौरे, रात्री उशीरा घरी येणे, इत्यादी करावे लागते हे पाहून त्यांचे पितृ – मन अस्वस्थ होत असे .
आम्हा तीनही भावंडांची मुलं त्यांच्या वेगवेगळ्या वयात कारणापरत्वे (कारण आम्ही सदा बिझी) आई दादांकडे राहिलेली आहेत व त्यामुळे प्रत्येकाऩे त्यांचे काही ना काही गुण घेतलेले आहेत. प्रत्येकाजवळ त्यांच्या बऱ्याच आठवणी जपलेल्या आहेत. आता तर त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ माझ्या मुलाने संस्कृतच्या प्रसार–प्रचारसाठी एक ट्रस्ट स्थापन करुन काम सुरु केले.
शेवटी त्यांची एक आठवण सांगितल्याशिवाय रहावत नाही. माझ्या उच्चशिक्षित मुलाने वीज हे शाळकरी मुलांसाठी लिहेलेले पुस्तक प्रसिद्ध झाले. ते त्यांनी आवडीने वाचले व एक प्रश्न विचारला --
समजा, एका बॅटरीच्या एका टर्मिनलला तार जोडून ती तार पृथ्वीभोवती गुडांळून बॅटरीपर्यत परत आणली व बॅटरीशेजारीच एका बल्बला स्विचमार्फत वीज पुरवठा देण्याची सोय करून मग ती तार बॅटरीच्या दुसऱ्या टर्मिनलला जोडली तर स्विच ऑन केल्यावर दिवा पेटायला क्षणभर पुरेल की जास्त वेळ लागेल? त्यांची प्रश्न विचारण्याची क्षमता पाहून आम्ही थक्क झालो. क्वचितच कुणाला असा प्रश्न पडेल. माझ्या मुलाने या प्रश्नाचे उत्तर दिले कि तारेत वीज खेळत असल्याने दिवा पेटायला वेळ लागणार नाही. मात्र तारेच्या लांबीमुळे मोठ्या प्रमाणावर इंडक्शन करंट निर्माण होऊन दिवा अगदी मंद पेटेल. या उत्तराने समाधान झाल्यावरच त्यांनी मुलाचे कौतुक केले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------









कोई टिप्पणी नहीं: